Thursday, February 10, 2011


श्रावण- एक आनंदोत्सव

भारतातल्या अठरापगड जातीतल्या प्रत्येक गटाला श्रावण महिना असा अमाप उत्साहाचे उधाण आणणारा असतो. एकात्मता साधणारा एक आनंदोत्सव असतो......






नववधूसारखा जणू हिरवागार शालू नेसलेली धरती, तिच्या अंगावर पिवळ्याधमक ऊन्हाचा झुळझुळीत शेला, शेल्याला इंद्रधनुष्याचा सप्तरंगी काठ, रिमझिमत येणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरींनी तिच्या अंगांगावर रोमांचासारखी फुललेली गवताची कोवळी पाती.... सगळ्या चैतन्याला जणू उधाण येतं आणि "आला श्रावण, आला श्रावण' असा सृष्टीच्या अणूरेणूतून नाद उमटतो.
सृष्टीतला हा उत्सव माणसाच्या मनात भिनत जातो. फुललेल्या मनाची सर्जनशीलता साहित्य, काव्य, नृत्य, नाट्य, चित्र, संगीत अशा निरनिराळ्या कलाविष्काराचं रूप घेते. श्रावण असा निसर्ग आणि मानवाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सम्राट बनतो.
धार्मिक दृष्टीनं श्रावण अत्यंत पवित्र महिना मानला जातो. देवदेवतांच्या पूजा, व्रतवैकल्यं करून भरपूर पुण्यसंचय करून ठेवावा. श्रावणाला शिवमास असंही म्हणतात. कहाण्यांप्रमाणे श्रावणात समुद्रमंथन झालं आणि त्यातून आलेलं हलाहल शंकरानं प्राशन केलं. यासाठी श्रावणी सोमवारी शिवाची पूजा करतात, शिवामूठ वाहतात, उपवास करतात. मंगळवारी नववधू पार्वतीची पूजा करून मंगळागौर साजरी करते. शुक्रवारी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करण्यासाठी तिला साकडं घालतात, सवाष्ण जेवायला घालून साखर-दूध फुटाण्याचा प्रसाद वाटला जातो. गुरुवारी गुरुचरित्राचे पाठ. रविवारी आदित्याची पूजा. सत्यनारायणाची पूजा... असा श्रावण आध्यात्मिक दृष्टीनं गजबजलेला महिना असतो.



सणांचा राजा- श्रावण

भारतीय संस्कृतीत सणांचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण हा चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचा महिना. त्यामुळे अनेक सण साजरे केले जातात. निसर्गावर आधारित सणांमध्ये नारळीपौर्णिमा येते. नारळ हा कल्पवृक्ष आणि धार्मिक कार्यात अत्यंत महत्त्वाचा! ओटी भरण्यासाठी, ज्येष्ठांचा सत्कार करण्यासाठी, पूजेमध्ये नारळाचा मान मोठा! या नारळाच्या झाडाविषयी कृतज्ञता म्हणून हा सण. कोळी लोकांना तर या सणांची फार अपूर्वाई असते. त्यांना अन्न देणाऱ्या समुद्राची ते पूजा करतात. त्याला नारळ अर्पण करतात. या आधी चार महिने मासेमारी बंद असते. त्या काळात माशांच्या पिल्लांची वाढ पूर्ण होते. पावसाळ्यात खवळलेला समुद्र आता शांत झालेला असतो. नारळीपौर्णिमेला प्रथम रंगरंगोटी केलेली होडी समुद्रात घालतात.
कृषिप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे सणांमध्ये शेतकऱ्यांचे उपकारकर्ते नाग आणि बैल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी आणि बैलपोळासारखे सण साजरे केले जातात. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नायनाट करणारे नाग, साप यांची पूजा नागपंचमीत केली जाते. बत्तीसशिराळा, भीमाशंकर इथे लाखो नाग-सापांचे प्रदर्शनही भरते. बैलपोळ्याला शेतात वर्षभर काम करणाऱ्या बैलांना झूल घालून, रेश्‍मी गोंडे, घुंगराच्या माळा, बाशिंगं बांधून सजवलं जातं. पूजा करून गोडधोडाचा घास भरवला जातो.

नातेसंबंधांवर आधारित सणही
राखीपौर्णिमा हा असाच बहीण-भावांचा पवित्र नात्याचे बंध अजून भक्कम करणारा सण श्रावणात येतो. पूर्वी उत्तर भारतात प्रजा राजाला राखी बांधत असे. राजाकडून त्यामुळे संरक्षणाचे आश्‍वासन मिळे. आज ई-राखीसुद्धा पाठविली जाते. सामाजिक आशयाने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांना राखी बांधली जाते. हॉस्पिटल, अनाथाश्रम, कारागृह अपंग वसतिगृह, वृद्धाश्रम इथेही राखीपौर्णिमा मुद्दाम आयोजित करून सामाजिक बांधिलकी व्यक्त केली जाते. मातृदिन हा पिठोरी अमावास्येला साजरा करून मुलांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते.
"कृष्ण' हे तर भारतीय संस्कृतीला पडलेलं सुरेख स्वप्न आहे. श्रावणातील अष्टमीला मध्यरात्री कृष्णजन्म झाला. त्यामुळे गोकुळाष्टमी संपूर्ण भारतात फार मोठ्या प्रमाणात साजरी करतात. मथुरा-गोकुळ, वृंदावन, द्वारका इथे तर उत्सवाचा विशेष थाट असतो. कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा म्हणजे तरुणाईचा जल्लोष अनुभवायला मिळतो. "गोविंदा आला रे आला'च्या तालावर मानवी थर उभे करून दहीहंडी फोडली जाते.
श्रावणातील वेगवेगळ्या उत्सवात वेगवेगळी पक्वान्नं केली जातात. श्रावणाची सुरवात होते तीच कणकेच्या दिव्याच्या बेताने! नागपंचमीला उकडलेले पुरणाचे दिंड, श्रावणी शुक्रवारी आणि बैल पोळ्याला पुरणपोळ्या, नारळी पौर्णिमेला नारळी भात, नारळाच्या करंज्या खाण्यापिण्याची धमाल असते.
या सर्व उत्सवात काही ना काही कारणाने नाच, गाणी येतातच ! नागपंचमीला स्त्रिया मेंदी काढतात, झोपाळे बांधतात, झिम्मा, फुगड्या असे खेळ रंगतात, मंगळागौरी तर रात्र रात्रभर "खुर्ची का मिर्ची', पिंगा, उखाणे, फुगड्या असे खेळ खेळत जागवतात, नारळी पौर्णिमेला कोळ्यांची नृत्यं, गाणी रंगात येतात. श्रावणावर आधारित अनेक लोकगीतं आपल्याकडे म्हटली जातात. उपशास्त्रीय संगीतातही सावनी, कजरी, झुला यासारखे गायन प्रकार या ऋतूवर आधारित आहेत.

सासुरवाशिणींना श्रावण ही पर्वणी वाटते. 
"सावनके झूले' लागले की माहेरी जायला मिळतं. सर्व सणांना शाळांना भरपूर सुट्या म्हणून विद्यार्थी खूष असतात. पूजा, धर्मग्रंथ वाचन, प्रवचन यांनी देवळात भरपूर कार्यक्रम म्हणून ज्येष्ठ मंडळी आनंदात असतात. पौरहित्य करणाऱ्या गुरुजींना भरपूर काम असतं. संगीत, नृत्य क्षेत्रातील कलाकारांना अनेक कार्यक्रम असतात. १५ ऑगस्टसारखा राष्ट्रीय सणही याच महिन्यात येतो म्हणून राजकीय क्षेत्रातही धावपळ असते.

श्रावणी सोमवारचे व्रत
श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताचा विधी सर्व व्रतांत सारखाच असतो. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करणे शुभ मानले जाते. 

श्रावणी सोमवारचे व्रत सूर्यादयापासून प्रारंभ करून तिसर्‍या प्रहरापर्यंत केले जाते. शंकराच्या पूजेनंतर सोमवार व्रताची कथा ऐकणे गरजेचे आहे. हे व्रत करणार्‍याने दिवसातून एकदाच जेवायला हवे.

असे करावे व्रत
श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे. 
गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे. 
घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे. 
पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा. 

'मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा.-
'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥

ध्यानानंतर 'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा. 
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका. 
त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.
मग भोजन वा फलाहार घ्या. 

श्रावणी सोमवार व्रताचे फळ
सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते. 
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो. 
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात.

शुद्ध, सात्विक, पवित्र श्रावण
हिंदू पंचागाप्रमाणे देवशयनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. म्हणजे आषाढी ते कार्तिकी एकादशी ह्या चार महिन्यांच्या काळात देव निद्रिस्त असतात, असे मानले जाते. त्यामुळे ह्या काळात पृथ्वीवरील सर्व बर्‍यावाईट घटनांचा परिणाम मानवावर होत असताना नेहमीप्रमाणे देवाच्या कृपेचे छत्र अखंड रहावे म्हणून या काळात जास्तीत जास्त पूजा-पाठ, जप जाप्य, प्रवचने, कीर्तने, भागवत सप्ताह, पारायणे केली जातात. या योगे देवाच्या कृपेचे छत्र कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्यामुळेच या चार महिन्यात तो जास्तीत जास्त सदाचरणी रहाण्याचा प्रयत्न करतो. 
या चार महिन्यांपैकी दुसरा येणारा श्रावण हा तर अत्यंत पवित्र महिना मानण्यात येतो. गटारी आमावस्येला मनाचा मलिनपणा गटारात (घाणीत) सोडून द्यायचा असतो आणि दिव्याच्या अवसेला जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात तसेच मनही लख्ख करावे. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडते. श्रावणी सोमवार, प्रदोष हे सर्व पर्वकाल ह्याच काळात येतात. सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असणारा भगवान शिव त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे असे वाटते म्हणूनच प्रत्येक श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.

सोमवारी काय वहाल? 
पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ, दुसर्‍याला तितीळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची मुठ, चौथ्याला जवस आणि जर पाचवा सोमवार आला तर सातूची मूठ शंकराला अर्पण केली जाते. यात अध्यात्मिक पूजेचे समाधान आहेच, पण पूर्वी आपल्याच शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग देवाची कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करण्याची वृत्ती आहे, त्या अर्पिलेल्या धान्यातून ते त्या देवालयाच्या पुजारी, गुरव इत्यादींच्या चरितार्थाचेही साधन होते म्हणून यात मानवताही आहे. 

उपासाचा शास्त्रीय अर्थ
याच काळात जास्तीत जास्त उपास असल्याचे कारण देवाच्या सा‍निध्यात वास करावयाला मिळावा हे आहेच. पण कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो त्यालाही जास्त काम करावयास लागू नये हाही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात हवामानामुळे शरीरच्या हालचाली कमी होण्याने तसेच जाठराग्नी प्रदिप्त नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघ‍न किंवा अल्प सात्विक आहार हे अत्यंत प्रभावी औषध आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना, तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन ते हरीनामाकडे त्याचा जप करण्याचे काम करू लागते हे काय कमी आहे?

श्रावणातील मंगळागौर 

जिभेचे चोचले पुरविण्याचे कमी झाल्यामुळे सा‍हजिकच त्या दिवशी घरच्या गृहिणीलाही थोडा विसावा मिळतो व तिही आपल्या मैत्रिणींसमवेत नटूनथटून देवाच्या पूजेला, मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलाची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते.
मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी जमतात. यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाला आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसमवेत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होतात. 
मोठेपणाचे जोखड काही वेळ बाजूला ठेवून मंगळागौर जागवायला सगळ्याजणी तयार असतात. त्या खेळतात, गाणी म्हणतात फेर धरतात व मनातल्या भावना गीतांतून व्यक्त करून मोकळ्या मनाने पुढच्या दिवसांना, संकटांना सामोर्‍या जायला सज्ज होतात. अगदी सगळ्या सासुरवाशिणी (वय वाढली तरी) ह्या श्रावणातील सणांची वाट बघत असतात ते गौर जागवणं ते नागपंचमीचे वडाच्या पांख्यांवर घेतलेले उंच उंच झोके, रात्री हातला काढलेली मेंदी अन् त्या प्रत्येकाबरोबर लहानपणीच्या, तरुणपणीच्या सुखद आठवणी.

No comments:

Post a Comment