कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी स्त्रिच्या लग्नानंतरच फ़लित असेल तर "नको तो संसार एकटच कुठेतरी दूर जाऊन संन्यास घ्यावा, एकांतात अगदी एकटच राहून जीवन काढावं" किंवा हे जिवनच नको असं म्हणणाय्रा कितीतरी स्त्रिया जवळजवळ नोकरी करणाय्रांमध्ये किमान १० स्त्रियांमागे ७ स्त्रिया असतात. याचा अर्थ काय? परत एकदा स्त्रिया भरडल्या जात आहेत. फ़रक एवढाच कि क्षेत्र किंवा स्वरुप बदललेल आहे.
स्त्रीने नोकरी करावी का नाही? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असत. ते परिस्थितीवर व विचारसरणीवर अवलंबून असतं. बय्राच वेळा ते तिच्या स्वत:वरही असतं.
आज प्रगतीसाठी आकाशही ठेंगण पडत असताना तिने घरात बसण. हे शक्यच नाही. किंबहूना तिच्यामध्ये खरी प्रगतीची बिजे आहेत. आज जवळजवळ सगळीच क्षेत्रे तिने काबीज केली आहेत.
तुज पंख दिले देवाने
कर विहार गगणावरती !
देवाने तिला बुध्दीमत्ता दिली आहे, त्याच बरोबर सहनशिलता, प्रेमळ अंतकरणही दिले आहे. त्या जोरावर तिने आकाश, पाताळ, जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलाही आहे.
पण स्त्रियांवर एकीकडे कौतुकाचा वर्षाव होतो, तर एकीकडे ति भरडली जाते. 9 - 5 ऑफ़िसमध्ये काम करणारी स्त्री सगळ्यानांच खुप सुखी, आनंदी वाटते. पण 8.30 वाजता ति ऑफ़िसला येते म्हणजे तिला सकाळी 8 - 8.३० ला घर सोडावेच लागते, किंबहुना काहींना याच्यापेक्षाही लवकर. तेही घरातली सगळी कामं उरकून. काही राहील नाही ना याची वारंवार खात्री करुन घ्यावी लागते. सकाळी ५-६ ला उठून ९ पर्यंत म्हणजे ३-४ तासात तिला दिवसभराचं सगळं घरकामं करायच असतं. सगळ्यांचे लाड, हट्ट पुरवायचे शिवाय ऑफ़िसला येताना जेव्हा तिचं मुल आई ऑफ़िसला जाणार म्हणजे दिवसभर नसणार म्हणून तिच्याकडे केविलवाणे बघते व तिला आज जावू नकोस ना ! म्हणून सांगते तिच्याकडे हट्ट धरते तेव्हा तिची घायाळ हरिणीसारखी होणारी स्थिती कुणालाच दिसत नाही. त्या इवल्याशा चिमण्या जिवाला घरी सोडून जाणं तिच्या किती जिवावर येतं. दिवसभर तिच्या डोळ्यासमोर त्याचा इवलासा चेहरा दिसतो तेव्हा तिला किती त्रास होत असेल ह्याचा कुणी विचारही करत नाही. उलट दिवसभर बाहेर असते म्हणून तिच्या नोकरीवरच आक्षेप घेतला जातो.
आता मला सांगा एवढसं मुल सोडून कुणालाही नोकरीवर जाण्याची हौस नसते. तर ति गरज आहे. कारण आजकालच्या या महागाईच्या जमाण्यात पुरुष एकटा सगळं कसं चालवू शकेल का ? मुलांना उज्ज्वल भवितव्य द्यायचे असेल, चांगले शिक्षण द्यायचे असेल, त्यांना आपल्यासारखा जगण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, व सर्व सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात व आपल्यामधल्या कलागुणांचा विकास व्हावा, म्हणून दोघांनी मिळून काम केलं पाहिजे, म्हणून ति नोकरी करत असते ना ?
बाहेरच्यांच जाऊ दे पण घरातल्याचं काय ? ति घरातल्यांसाठी त्यांचा गरजा पुर्ण व्हाव्यात म्हणून राब-राब राबते. पण त्यांच्यालेखी तिच्या कष्टांना काहीच किंमत नाही. का तर चकाचक ऑफ़िसमध्ये खुर्चीवर जाऊन बसते, थंडगार ए.सी मध्ये चहा घेते, चांगले चांगले कपडे घालते, म्हणजे ति त्या ए.सी असलेल्या ऑफ़िसमध्ये जाऊन काहीच काम करत नसेल का ? तिला फ़ुकटच पगार मिळत असेल का? आजकाल सख्खा भाऊ भावाला एक रुपया सोडत नाही. मग तो कंपणीचा मालक काय दानशूर कर्ण लागून गेलाय का ? की काही काम न करता फ़ुकट पगार देईल. आणि ते ठिक आहे पण त्याच कंपण्यात पुरुषसुध्दा काम करतात, त्यांना बाहेरचं काम काय असतं किती असतं हे माहीत असतं, तरी घरी आल्यावर आपल्या बायकोने काहीच काम केलं नाही ति बाहेर जाऊन सागरगोटे खेळून आलीय व आपण खुप मोठा डोंगर फ़ोडून आलोय या अर्विभावात सोफ़्यावर लोळत, टिव्ही बघत एक एक आज्ञा देत असतात. व नम्र सेवकाने/ बायकोने कुरकुर न करता व पटापट त्या ऎकल्या पाहीजेत हि अपेक्षा असते. म्हणजेच घरात आपण पैसे न देता स्वत:च पैसे देणारी कायमस्वरुपी कामवाली मिळाल्यासारखं वागवत असतात.
आता इकडे बघा. आपल्याला जेवढं काम आहे तेवढंच काम सोबत असणाय्रा स्त्रि सहकाय्राला असतं हे माहित असूनही तिला ऑफ़िसमध्ये कमी लेखतात. तिला घरची सगळी काम उरकून यायला किंवा कधी बस चुकली म्हणून किंवा कधी इतर काही कारणांमुळे उशीर होतो तेव्हा झाली लगेच त्यावर चर्चा, लगेच लेटमार्क लावला जाणार. कधी मन मोकळं करण्यासाठी त्या दोघी बोलत असतील तर झालं त्यांना लगेच बोलायला सुरुवात करणार. कधी मुलांना बर नाही म्हणून लवकर गेल तर त्यावर लेक्चर ऎकाव लागत. आणि घरी नाही गेलं तर इकडे हिचा जिव तुटर असतो.
म्हणजे बघा ना ! घरी जरा कुठे कमी पडली तर घरचे बोलणार व ऑफ़िसमध्ये काही कमी-जास्त झाले तर ऑफ़िसमधले बोलणार. स्त्रि साठी खरी तर हि दोन विश्वच असतात. पण दोन्ही ठिकाणी जर कुचंबणा होत असेल, ति भरडून निघत असेल तर नको हे जिवण आता संन्यास घ्यावा व दूर निघून जावं असचं ति म्हणणार ना ?
तिने कधीच स्वत:चा विचार केला नाही, स्वत:च्या मताची किमंत केली नाही, स्वत:चा मनाचा कौल घेतला नाही व स्वत:च्या इच्छांना नेहमीच पायदळी तुडवलं कधी बाहेरच्यांसाठी तर कधी घरातल्यांसाठी. हेच आणि असचं जिवन जर एखाद्या सुशिक्षीत, उच्च शिक्षीत स्त्रिचं असेल तर अडाणी, गावंंढळ म्हणून जगणचं चांगलच ना. कारण त्यामुळे आता जेवढा त्रास तिला होतोय तो तर झाला नसता.
हि मुलगी आज कितीतरी जणीचं प्रतिनिधित्व करत आहे, आज प्रत्येक स्त्रियांना या परिस्थितीला समोरे जाव लागतं आहे. ह्या लिखानाचा माझा उद्देश कुठलेही ऑफ़िस किंवा कुणाच्याही घराच्यांवर आरोप करण्याचा नाही. तर असा आहे की आज समाजातील जास्तीत जास्त स्त्रिया या नोकरी करणाय्रा आहेत. तेव्हा ति स्त्रि आपली कुणीतरी आहे, कुणाची बायको, मुलगी, बहीण, आई तसेच ति एक संवेदनशील व्यक्ती आहे. तिच्याकडे फ़क्त इंजिन म्हणून न बघता ति लवचीक, प्रेमळ, वात्सल्यमयी, सहनशील आहे. तिला घराच्यांकडून प्रेमाचे चार शब्द व प्रोत्साहनाचा हात हवाय तर ऑफ़िसच्यांकडून आपुलकीचे चार बोल व मदतीची अपेक्षा आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाने जर ठरवून खरचं मनापासून प्रयत्न केले तर तिला खरचं एक मानाच स्थान मिळेल. जर ति समाधानी, आनंदी असेल तर निश्चित घराचा व समाजाचा विकास होईल, तिला आनंदी ठेवा आणि बघा तिच्या खळखळून हसण्याने अवघं विश्व आनंदाने बहरून जाईल. सारी सृष्टी परत नव्या नवरीसारखी हिरवीसुंदर वाटायला लागेल. तिच्या प्रेमळ बोलांनी पाषाणालाही पाझर फ़ुटतो, तिच्या स्पर्शाने परीसाचेही सोने होते तिला तुम्ही हात द्या जमेल नसेल कृपया ओढू नका. तिची प्रगती लांबूनच बघत रहा.
मी अंगणातील जाई, मी तुझीच रे आई
जाते सोडूनी जेव्हा तुजला, होते भेटण्याची घाई
दिवसरात्र ही तुझ्याचसाठी लढते ही लढाई
येईन जेव्हा धावत तेव्हा म्हणशील कारे हळूच आई.
सुखी असू दे घरकुल माझे नमीते देवा तुझ्याचठाई ||
No comments:
Post a Comment